मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. अनेक सखल भागांत पाणी साचतं. पण हे साचलेलं पाणी मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. कारण या साचलेल्या पाण्यातून चालल्यास अनेक आजार होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 'लेप्टोस्पायरा' आजार होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी काय खबरदारी घ्यायची हे जाणून घेऊयात.
‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा स्त्रोत
‘लेप्टोस्पायरोसिस’ हा रोग ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसंच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.
बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे स्पायकाकिटस हा सूक्ष्मजंतू दुषित पाण्यात मिसळतो. या पाण्याशी संपर्क झालेल्या मनुष्याला ‘लेप्टोस्पायरोसिस’या रोगाची बाधा होऊ शकते. खास करून पावसाळ्यात हा आजार डोकं काढतो. पावसाळ्यात पाणी तुंबल्यानं अनेक जण या दूषित पाण्याच्या संपर्कात येतात.
कसा होतो लेप्टो?
- ज्या व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला असेल, त्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो.
- अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो.
- उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात मिसळतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते.
- व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.
- दूषित पाणी पिण्यामुळे सूक्ष्मजंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
कोणाला अधिक धोका?
- पावसाच्या दिवसात, पूरस्थितीमध्ये लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असतो.
- चिखल आणि प्राण्यांशी संपर्क येणाऱ्या शेतकरी वर्ग
- सांडपाणी निचरा करणारे
- सफाई कामगार
लेप्टोची सुरुवातीची लक्षणं
- तीव्र ताप
- थंडी वाजून येणं
- खोकला
- डोकेदुखी
- अंगदुखी
- थकवा जाणवणं
- घसा खवखवणं
- पोटदुखी
- उलट्या होणं
- अतिसार
- कावीळ
- डोळ्यात जळजळ होणे
- डोळे लाल होणे
लेप्टोची गंभीर लक्षणं
दुर्लक्ष केल्यास पहिल्या अवस्थेतील आजार गंभीर होऊन दुसऱ्या अवस्थेत पोहोचतो
- लिव्हरवर परिणाम होणं
- किडन्या निमाकी होणं
- फुफ्फुसांचा रक्तस्त्राव
- खोकल्यातून रक्त येणं
- श्वास घेण्यास त्रास
- हृदयाच्या कार्यात अनियमितता
काय खबरदारी घ्यायची?
- पावसाळ्यात पाणी फिल्टर करून किंवा चांगले उकळून थंड करून प्यावे
- सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणं टाळावं
- उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत
- पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणं टाळावं किंवा गमबुटाचा वापर करावा.
- साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणानं स्वच्छ धुवून कोरडे करावे.
- पायावर जखम असल्यास किंवा पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यास तात्काळ जखम स्वच्छ पाण्यानं साफ करावी आणि त्यावर अँटी-सेप्टीक औषध लावावं
- पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यु, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे
- उंदीर- घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
- घरात आणि आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. कच-याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.
- आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे लेप्टो प्रतिबंधात्मक लसीकरण आणि इतर आवश्यक ते लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळच्या-वेळी आणि नियमितपणे करवून घ्यावे.
- ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.
हेही वाचा