कल्याण-डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आता महापालिका प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. महापालिकेने ११ मार्चपासून कल्याण-डोंबिवलीत कडक निर्बंध लागू केले आहेत.
बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३९२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ५ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावून कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले.
हे आहेत निर्बध
१) दुकानांची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी असेल. अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे.
२) शनिवार आणि रविवारी पी-१ आणि पी-२ या व्यवस्थेनुसार दुकाने सुरू ठेवली जातील.
३) खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गाड्यांनादेखील संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी असेल.
४) भाजीमंडई ५० टक्के क्षमतेनेच चालवल्या जातील.
५) लग्न आणि हळदी समारंभांवर कडक निर्बंध असतील. अशा कार्यक्रमांमध्ये ५० लोकांच्या संख्येचे उल्लंघन करू नये. या समारंभांसाठी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंतची वेळ ठरविण्यात आली आहे.
६) अशा कार्यक्रमांत उल्लंघन झाले तर वधू-वराच्या माता-पित्यांविरोधात आणि मंगल कार्यालयांविरोधात गुन्हे दाखल केले जातील.
७) आठवडी बाजारांवरदेखील निर्बंध असतील.
८) बार आणि हॉटेल्ससाठी रात्री ११ ऐवजी ९ वाजेपर्यंतचीच वेळ ठरवण्यात आली आहे.
९) होम डिलिव्हरीसाठी रात्री १० वाजेपर्यंत मुभा असेल.
१०) पोळी-भाजी केंद्रदेखील रात्री ९ पर्यंतच सुरू राहतील.
११) महाशिवरात्रीसाठी कल्याण-डोंबिवलीतील ६२ मंदिरे फक्त पूजेसाठी उघडले जातील, दर्शनासाठी मंदिरे बंद राहतील.
१२) कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे मास्क वापरणे अनिवार्य असेल.
१३) होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोनाबाधित फिरताना आढळले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
१४) होम आयसोलेशनसाठी घरात जागा असणाऱ्यांनाच होम आयसोलेशनची परवानगी असेल.