मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मुंबईत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळं मृत झालेल्या रुग्णांच्या संख्येत ६० वर्षांवरील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळं या रुग्णांवर पालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागानं परिपत्रक काढलं आहे. त्यामुळं वयोवृद्ध रुग्णांसाठी दिलासा दायक बातमी आहे.
६० वर्षीय रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांवर मॅटरनिटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे.
राज्यात २६ जणांचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन काही भागात वाढवलं जाऊ शकतं असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. याबाबत मात्र राज्य सरकारन कोणताही निर्णय घेतला नाही.
राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या अधिक आहे. महापालिकेनं शहरातील काही भाग कोरोना प्रभावित जाहीर केले आहेत. या परिसरातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.