नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी आता पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी येत्या ऑगस्ट क्रांती दिन म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी गावोवावी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत १ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली. विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे असे भूमिपूत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात रूपरेषा, नियोजन इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आमदार महेश बालदी, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, अशी मागणी आगरी समाजाकडून केली जात असून या मागणीला इतर समाज आणि अनेक राजकीय पक्षांनीदेखील पाठिंबा दिला आहे. तरीही या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. यामुळे १० जून रोजी आगरी समाजाबरोबरच इतर समाज तसेच विविध पक्ष मिळून नवी मुंबई येथील सिडको येथे मोठे आंदोलन केले होते.
यावेळी मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला अनेक नेते, भूमिपुत्र आणि स्थानिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होत. तर २४ जून रोजी पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी लढा उभारण्यात आला.