राज्यात भाजपाचे सरकार पुन्हा आल्याने काँग्रेसचे आमदार जेष्ठ नेत्यांवर भडकले आहेत. सत्ता स्थापनेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास उशीर केल्यानेच राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या या परिस्थितीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याचा आहेत असा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची संधी होती. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास उशीर केला. चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला असं काँग्रेसच्या आमदारांचं म्हणणं आहे.
पंधरा दिवसांपासून दिल्लीत आणि मुंबईत बैठका घेतल्या जात आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींब्याचे पत्र देण्यास उशीर केला. त्यामुळे शिवसेनेला संख्याबळ अभावी राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही, असं काँग्रेस आमदारांनी म्हटलं आहे.