कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सरकार व महापालिकेनं मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच, मास्क नाही, तर सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश नाही, असे आदेशही मुंबई पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र तरीही अनेक प्रवाशी मास्क न लावता प्रवास करत आहेत. परिणामी, आशा प्रवाशांना रोखताना बेस्ट कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे.
प्रवासी मास्क न वापरण्याची अनेक कारणे देत असून, वाहकाशी हुज्जतही घालत असल्याची माहिती समीर येत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बेस्ट प्रवासादरम्यान एका आसनावर १ प्रवासी आणि उभ्याने ५ प्रवासी या शासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणीही सध्या गर्दीमुळे शक्य झालेली नाही. त्यात आता मास्क नसलेल्यांना बेस्टचा प्रवास बंद, असा फतवा पालिकेनं काढल्यानं चालक-वाहक आणि प्रवाशांमधील वादावादीत भरच पडली आहे.
अनेक प्रवासी बेस्ट प्रवासादरम्यान मास्क घालण्यात टाळाटाळ करतात. चालती बस थांबवून प्रवाशांना रस्त्यात उतरविणे शक्य नसते. तसे आदेशही नसल्याचे बेस्ट वाहक सांगतात. त्यामुळे मास्क घालण्याचे आवाहन करण्याखेरीज काहीही पर्याय वाहकांसमोर राहत नाही.
बेस्ट बस गाड्यांवर, बस थांब्यांवर मास्क नाही, तर प्रवेश नाही, असे आवाहन करणारे फलकही लावले आहेत, परंतु त्याकडे काही जण दुर्लक्षच करतात. याशिवाय बसमध्ये प्रवेश केल्यानंतर मास्क न घातलेल्या प्रवाशांना बसमधून पुन्हा उतरवू शकत नाही. अशा प्रवाशांची वाहकांबरोबरच काही वेळा अन्य प्रवासीही समजूत काढतात.
बस सुरू होण्याअगोदरच ही बाब निदर्शनास आली तर त्यांना प्रवेश नाकारू शकतो, परंतु प्रवासावेळीच प्रवाशांकडून मास्क वापरली जात नसल्याचे वाहक सांगतात.