प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्या सीएसएमटी- कल्याण- टिटवाळा- बदलापूर या मुख्य मार्गावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयानंतर मुख्य मार्गावर एसी लोकलच्या 12 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. एकूण रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या 44 वरून 56 होणार आहे. इतकेच नाही तर 14 मे पासून म्हणजेच उद्यापासून 14 एसी लोकल सेवा या रुळांवर धावणार आहेत.
AC local Time Table @Central_Railway pic.twitter.com/VTatVhBODt
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 13, 2022
हार्बर मार्गावरील एसी लोकल मेन लाईनवर आणि मेन लाईनच्या नॉन एसी सेवा हार्बर लाईनवर हलवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, म्हणजेच गाड्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही.
रेल्वेने 5 मे रोजी भाड्यात कपात केल्यानंतर एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. संख्या वाढल्याने एसी लोकलची सेवा वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सध्या 1810 लोकल धावतात. त्यापैकी 894 सेवा मेन लाईनवर, 614 हार्बरवर, 262 ट्रान्स हार्बरवर आणि 40 सेवा चौथ्या कॉरिडॉरवर (उरण लाईन) धावतात. सध्या मध्य रेल्वेकडे एसी लोकलचे 5 रेक असून त्यात 4 मधून सेवा चालवली जात आहे, तर एकाची दुरूस्ती सुरू आहे.
हेही वाचा