विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील एसटी सेवा पूर्णत: ठप्प आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने सर्व खासगी प्रवासी बस, शालेय बस, कंपनीच्या मालकीच्या बस, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा ९ नोव्हेंबरपासून दिली. मात्र प्रत्यक्षात मुंबईतील आगारांमध्ये मात्र ही सेवा सुरू नसल्याचे दिसत आहे.
राज्यातील विविध आगारातून सेवा सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांच्या भीतीपोटी मुंबईतील परळ, कुर्ला- नेहरूनगर आणि मुंबई सेन्ट्रल आगार बंद ठेवण्यात आले असून शहराबाहेर जाण्यासाठी प्रवाशांना मुंबईतील खासगी वाहतूक व्यावसायिकांवर अवलंबून राहावे लागले. राज्यातील प्रत्येक आगारात ही वाहने उभी राहिली आणि एसटीच्या भाडेदराने सेवा देऊ लागले. मात्र मुंबईतील परळ, कुर्ला-नेहरूनगर आणि मुंबई सेन्ट्रल हे आगार बंदच ठेवले असून प्रवाशांसाठी एकही खासगी बस किंवा अन्य वाहन सुविधा देण्यात आलेली नाही.
कुर्ला-नेहरूनगर आगार, परळ आगारातील प्रवेशद्वारांवरच एसटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले आहे. तीनही आगारांच्या प्रवेशद्वारांवर पोलीसही तैनात आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरही एसटीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्यामुळे खासगी बसची सेवा देताना कोणतेही नुकसान होऊ नये या भीतिपोटी महामंडळाने तीनही आगारातून खासगी वाहतूक सुविधा बंद ठेवली आहे.