बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्यात येणार आहे. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (transport minister anil parab) यांनी भोजनभत्ता देण्याची घोषणा केली आहे. बेस्ट (best) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमानं एसटी महामंडळाची मदत घेतली. अनेक एसटी बेस्टच्या मार्गावर धावत आहेत.
मागील २ महिने एसटीच्या सुमारे १ हजार बसेस मुंबईतील बेस्ट वाहतूकच्या मदतीसाठी धावत आहेत. त्यासाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एसटी (msrtc) कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्यानं जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीनं रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीनं भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश अनिल परब यांनी दिले होते. त्यानुसार एसटी प्रशासनातर्फे (msrtc) त्वरित कार्यवाही करून सदर भोजन व्यवस्था बंद करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्याची व्यवस्था केली आहे.
कर्मचारी राहत असलेल्या निवास व्यवस्थेची रोजच्या रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती व क्षेत्रिय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ७ पथकं तयार करण्यात आली असून, त्याच्यांव्दारे कर्मचाऱ्यांना पुरवविण्यात येणाऱ्या निवास व्यवस्थेबाबत अहवाल मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. बेस्ट सेवेसाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई राहण्याची व जेवणाची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबतची योग्य ती काळजी घेतल्याचे निर्देश मंत्री परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.