कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, राज्य सरकारनं गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमुळं सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनाकाळातही गर्दी होत असलेल्या मुंबई लोकलमधील प्रवासी संख्येत १० लाखांची घट झाली आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम रेल्वेवरील रोजची प्रवासी संख्या १६ लाखांच्या आसपास होती. १५ एप्रिलनंतर ती ११ लाखांपर्यँत खालावली आहे. मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्येत ६ लाखांहून अधिक घट झाली आहे.
मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर वरील एकूण प्रवासी संख्या १७ लाखांपर्यंत पोहोचली आहे. कमी होणाऱ्या प्रवासी संख्येवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. सध्या केवळ अत्यंत महत्त्वाचे काम असलेले प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकल प्रवास करत आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीची वेळ वगळता अन्य वेळेत गाड्या रिकाम्या धावत आहेत. दुपारच्या वेळेत अनेक रेल्वे स्थानकांवर तुरळक प्रवासी असतात.