थंड पदार्थ खा जपून! मुंबईतला ९८ टक्के बर्फ दूषित

  • भाग्यश्री भुवड
  • सिविक

उन्हाळा आल्याने सर्वांनाच तहान लागल्यावर थंड पाणी प्यावसं वाटतं. खासकरून घराबाहेर पडल्यावर थंडगार ज्यूस, ताक, लस्सी याकडे अनेकांच्या नजरा खिळतात. पण रस्त्यांवरील पेय पदार्थ पिताना जपून प्या किंवा शक्यतो बर्फ टाकलेले पेय पदार्थ पिण्याचं टाळा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात शहरातील ९८ टक्के बर्फ प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. अन् पैसा कमावण्याच्या नादात दुकानदार दूषित बर्फापासून बनवलेल्या पेय पदार्थांद्वारे आजार पसरवत आहेत.

कुठे केलं सर्वेक्षण?

महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे विक्रेते इत्यादी ठिकाणांहून तपासणीसाठी बर्फाचे नमुने गोळा केले होते. या तपासणीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त नमुने दूषित आढळले. याचा अर्थ असा की या बर्फापासून बनवलेले पेय पदार्थ आपल्याला आजारी पाडू शकतात.

४०० नमुने दूषित

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बर्फाची गुणवत्ता तपासण्यासाठी १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत शहरातील ठिकठिकाणाहून ४१० नमुने जमा करण्यात आले होते. तपासणीनंतर धक्कादायक वास्तव समोर आलं. ४१० नमुन्यांपैकी ४०० नमुने दूषित आढळले. डॉक्टरांच्या मते, बर्फाची योग्यप्रकारे साठवणूक न केल्यामुळे आणि नीट लक्ष दिल्यामुळे बर्फात ई-कोलाय सारखा विषाणूंचा शिरकाव होतो. हा विषाणू खाद्य पदार्थ किंवा पेय पदार्थांच्या माध्यमातून शरीरात जातो.

बर्फाची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी आम्ही बरेच नमुने जमा केले होते. ज्यात ९८ टक्के बर्फ दूषित आढळला. ज्याचं सेवन शरीरासाठी हानिकारक आहे. बर्फाचे तपासणी अभियान सुरूच राहणार आहे.

- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

सतर्क राहा

डॉक्टरांच्या मते रस्त्यावरील ज्यूसच्या स्टॉल्सवर बंदी घालली पाहिजे. कारण अशा ठिकाणी साफ-सफाईची विशेष काळजी घेतली जात नाही. त्यामुळे पोटाचे विकार होतात. पण, सध्या उष्णता वाढल्यामुळे आपला थंड पेय पिण्याकडे कल असतो.‌

फॅक्टरीतही सापडला दूषित बर्फ

आरोग्य विभागाततील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ज्यूस दुकान, बर्फाचे गोळे बनवणारे स्टॉल्स याव्यतिरिक्त फॅक्टरीची तपासणी करण्यात आली. या दरम्यान १५ बर्फाच्या फॅक्टरींतील नमुन्यांची तपासणी केली. ज्यात मोठ्या प्रमाणात नमुने दूषित आढळले. या दूषित बर्फापैकी १४ हजार ७०० किलो बर्फ महापालिकेने नष्ट केला.

ई-कोलाय विषाणूंमुळे ग्राहकांना फुप्फुस, आतड्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ज्यामुळे लोकांमध्ये निमोनिया देखील होऊ शकतो. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या ठिकाणी साफ-सफाईची विशेष काळजी घेतली पाहिजे.

- डॉ. अविनाश सुपे, पोट रोग विशेषज्ञ


हेही वाचा-

खायचा बर्फ पांढरा, तर वापरायचा बर्फ असेल निळा!

जागतिक आरोग्य दिवस: नाहीतर, छोटे आजार होतील मोठे!


पुढील बातमी
इतर बातम्या