आपल्याला लहानपणापासून समजावलं जातं की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण, या तिन्ही गरजासोबतच आणखी एक महत्वाची गरज आहे, ती म्हणजे उत्तम आरोग्य. नेमकं याच महत्त्वाच्या गरजेकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.
दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने यंदा 'यूनिवर्सल हेल्थ' म्हणजेच 'प्रत्येकाला आरोग्य सेवा' अशी थीम ठेवली आहे. त्यामुळे सरकारचीही जबाबदारी वाढली आहे.
आपल्याकडे सध्या ज्या 'हेल्थकेअर' सुविधा आहेत, त्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे गरजूंना त्या मिळतही नाहीत. रुग्ण किंवा सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून आरोग्याच्या दृष्टीने सरकार आणि आपली स्वत: ची काय जबाबदारी आहे, याविषयी संवाद साधला.
सध्याच्या परिस्थितीत सरकारने फक्त सार्वजनिक धोरणांवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. ज्यामुळे सामान्यांना मूलभूत वैद्यकीय सेवा तरी उपलब्ध होईल. रोजचं प्रदूषण, व्यसन, कचरा, पोषक आहार, जीवनशैली, स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं मत जन स्वास्थ्य अभियानाचे डॉ. अनंत फडके यांनी 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना व्यक्त केलं आहे. शिवाय, लोकांनीही स्वत: ची काळजी घेतलीच पाहिजे, असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भारतात २० लाख डॉक्टरांची गरज आहे, जिथे आताच्या परिस्थितीत फक्त १० लाख डॉक्टरच उपलब्ध आहेत. ज्याचा ताण रुग्णांवर पडतोच. त्यामुळे सध्या डॉक्टरांची संख्या वाढवणं ही सर्वात मोठी गरज आहे. शिवाय, एक वर्षाचा ग्रामीण भागात सेवा देण्याचा बाँड सरकारने अनिर्वाय केला पाहिजे. म्हणजे खेड्यापाड्यातील रुग्णांना सेवेचा उपभोग घेता येईल.
शिवाय, कमी दरात सेवा उपलब्ध करुन दिली पाहिजे. यासोबतच जो वर्षानुवर्षे चालत आलेला ट्रेेंड म्हणजेच आजारी पडल्यानंतरच डॉक्टरकडे जायचं हा बदलला पाहिजे. नियमित तपासणी केल्या पाहिजेत. त्यामुळे ज्या आधीच मर्यादित सेवा आहेत त्यांच्यावरचा भार कमी होईल. आधीपासूनच सावधगिरी बाळगली तर हे सर्व प्रश्न कमी व्हायला मदत होईल, असं 'वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले' यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी या दिवशी एका विशेष आजाराला घेऊन एक थीम तयार करते. पण, यंदा आरोग्य दिनानिमित्त सरकारने सर्वांना आरोग्यसेवा ही थीम 'डब्लूएचओ'ने ठेवली आहे. या थीमनुसार फक्त सरकारनेच नाही तर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं आणि कुटुंबाचं आरोग्य आपण स्वत: सुधारलं पाहिजे. प्रत्येकाच्या गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे सेवा पुरवली पाहिजे.
सध्या नॉन- कम्युनिकेबल डिसीजचा वाढता प्रभाव आहे. म्हणजेच डायबिटीस, रक्तदाब, हायपरटेन्शन, कॅन्सर हे रोग आहेत त्यात आपण स्वत: काळजी घेऊन वाचू शकतो. त्यामुळे खर्च कमी देखील कमी होईल. साखर, तेल कमी खाल्लं तर वजन कमी होण्यास मदत होईल. कॉलेस्ट्रॉल कमी होईल. दरवर्षी एकदा तरी तपासणी करुन घेतली पाहिजे, असा सल्ला जनरल फिजीशियन डॉ. जयेश लेले यांनी दिला.
आतापर्यंत आपण पोट दुखतंय, छातीत दुखतंय, डोकं दुखतंय, डोळे दुखतात असं एक तरी वाक्य आपण दिवसाला ऐकतो. त्यावर उपाय म्हणून मी केमिस्टमधून गोळी आणली आणि ती खाल्ली असंही बोलताना ऐकतो. पण, याच छोट्या-छोट्या आजारांचं, लक्षणांचं केव्हा मोठ्या आजारांध्ये परिवर्तन होतं हे आपल्याला कळत देखील नाही.
अचानक खूप घाम येऊन चक्कर सारखं वाटणं देखील घातक असू शकतं. हे लक्षण कदाचित सौम्य हार्टअॅटॅकचं देखील असू शकतं. त्यामुळे किमान वर्षातून तीनदा पूर्ण शरीराची तपासणी योग्य पद्धतीने करुन घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्वत: ची आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याची शपथ नक्की घ्या.
हेही वाचा-
सिगारेट, तंबाखूच्या पॅकेटवर आता 'क्विट लाइन' हेल्पलाईन नंबर
मुंबईत २.७२ करोड व्यक्तींना ऑटिझम