मुंबईत सध्या प्रत्येक ६८ मुलांमागे एका मुलाला ऑटिझम असल्याचा धक्कादायक अहवाल फोरम फॉर ऑटिझम या संस्थेने दिला आहे. यानुसार, मुंबईत २.७२ कोटी व्यक्तींना ऑटिझम असल्याचंही फोरम फॉर ऑटिझम या संस्थेने सांगितलं आहे. येत्या २ एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ऑटिझमच्या व्यक्तींसाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ऑटिझमसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था, डॉक्टर्स, मुलं सहभागी झाले होते. हर्षा भोगल आणि पत्नी अनिता भोगले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
ऑटिझमग्रस्त असलेल्या व्यक्ती, डॉक्टर, पालक, समुपदेशक अशा सगळ्यांनी या आजाराचा स्विकार करून त्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी या फोरमची निर्मिती केली आहे. ऑटिझम म्हणजे नेमके काय? त्यातील औषधोपचार पद्धती कोणत्या? या मुलांना नेमकी कोणत्या गोष्टींची गरज आहे? अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर या कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.
या आजाराच्या उपचारांमध्ये पालकांची अनेकदा फसवणूक होते. नको तेवढा खर्च होतो. त्यामुळे ही फसवणूक करणाऱ्यांवर अंकुश असायला हवा, त्यासाठी हे उपचार कुणी करावेत? याची सुस्पष्ट नियमावली असायला हवी, अशी मागणी डॉ. समीर दलवाई यांनी यावेळी केली.
कामाच्या ठिकाणीही या मुलांना संधी मिळाली तर त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढेल.
समाजाने पुढाकार घेऊन या मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यायला हवं. तर, पालकांचे जसे सपोर्ट ग्रुप्स आहेत, तसाच पाठिंबा या मुलांना मिळायला हवा, अशी अपेक्षा हर्ष आणि अनिता भोगले यांनी यावेळी व्यक्त केली.