मुंबईची तुंबई झाल्यास जबाबदारी 'यांची'

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • सिविक

यंदा पावसाळ्यात मुंबईत पाणी साचून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून नालेसफाईचं काम वेगात सुरू आहे. नालेसफाई करूनही मुंबईची तुंबई झालीच तर त्याला महापालिका नव्हे, तर मुंबईत सुरू असलेलं मेट्रोचं काम जबाबदार असेल, असं म्हणत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं आहे. 

जागेजागी खड्डेच खड्डे 

पावसाळ्याच्या धर्तीवर मुंबईतील नालेसफाई आणि इतर कामांची पाहणी करत महापौरांनी कामाचा आढावा घेतला. एकीकडे पालिका नालेसफाईसह इतर कामं करत असताना दुसरीकडे मात्र मेट्रोच्या कामासाठी महापालिकेच्या पर्जन्यवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी उखडल्या गेल्या आहेत. या पर्जन्यवाहिन्या दुरूस्त करून देण्याएेवजी त्या तशाच ठेवल्या आहेत. जागेजागी खड्डे झाल्याचे या पाहणी दौऱ्यात दिसून आल्याचं महापौरांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.

मेट्रोच्या कामामुळे...

मेट्रोच्या कामामुळे पालिकेच्या पर्जन्यवाहिन्या नादुरूस्त झाल्या आहेत. त्या दुरूस्त करून देण्याची मागणी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)सह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडे केली आहे. मात्र त्यानंतरही दुरूस्ती झालेली नसल्याचंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर मुंबईत पाणी साचलं, तर त्याला केवळ आणि केवळ मेट्रोचं कामच जबाबदार असेल असा पुनरूच्चार त्यांनी केला.

नालेसफाई ५० टक्के  

आतापर्यंत मुंबईची ५० टक्के नालेसफाई झाली असून उर्वरित कामं त्वरीत पूर्ण करण्यासाठी कामाला वेग द्यावा, अशा सूचना यावेळी कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. तर पुन्हा दहा दिवसांनी महापौर नालेसफाईची पाहणी करणार असून यावेळी काम पूर्ण झालं नसल्याचं निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.


हेही वाचा- 

नगरसेवक निधीतील २५ कोटी गेले वाया, सत्ताधारी अपयशी

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळला


पुढील बातमी
इतर बातम्या