फोर्टमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना ५० हजार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईमधील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये तर दुखापतग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. अस्लम शेख यांनी केली. 

फोर्ट परिसरातील ६ मजली भानुशाली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०जणांचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशम दल, महापालिका कर्मचारी, पोलीस आणि स्थानिकांनी तात्काळ मदतकार्याला सुरूवात केली. गुरूवारी उशीरा रात्रीपर्यंत ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं. अस्लम शेख यांनी दुर्घटनाग्रस्त ठिकाणच्या भागाला भेट देऊन चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी इमारतीतील रहिवाशांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे तसंच जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. सोबतच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे निर्देश देखील अस्लम शेख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

दरम्यान, मालाड मालवणी येथील इमारतीच्या वरचा मजला बाजूच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत केली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं.

मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील गेट क्रमांक ५ येथील तळमजला अधिक २ प्रकारच्या एका इमारतीचा वरचा मजला गुरूवारी बाजूच्या तळमजला अधिक १ प्रकारच्या घरावर कोसळला. घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचं काम सुरु करण्यात आलं. दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. इतर सर्व १३ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आलं. ढिगारा उपसण्याचं काम रात्री उशीरापर्यंत सुरु होतं. या सर्व घटनेची पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसंच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर इमारतीच्या उर्वरित भागातील घरांचीही इतरत्र तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी त्यांना मदत करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्यात येणार असून बाधित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. तसंच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला


पुढील बातमी
इतर बातम्या