दिवाळी सणात शॉपिंगबरोबरच फराळालाही तितकेच महत्त्व दिले जाते. दिवाळी आली की खऱ्या अर्थाने वेध लागतात ते लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या खाण्याचे! दिवाळीच्या आधी साफसफाई सोबतच फराळ बनवण्यासाठी विशेष लगबग दिसून येते. गृहिणींना दिवाळीत खऱ्या अर्थाने आनंद मिळतो तो विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यातून!
घरातल्या प्रत्येक सदस्याची आवड निवड बघून घरात गोडसोबतच तिखट पदार्थ बनवले जातात. परंतु, हल्ली मुंबई शहरात अनेक महिला घरी हे खाद्य पदार्थ बनवणे टाळतात आणि त्या मार्केटमधून दिवाळीचा फराळ खरेदी करतात. परंतु सध्या सरकारने लावलेल्या जीएसटीचे सावट दिवाळीवर पहायला मिळत आहे.
सध्या फराळाची किंमत जीएसटीमुळे 25-30 टक्के वाढली असल्यामुळे खरेदी किती करायचे? आणि खायचे किती? असा प्रश्न सामान्य लोकांसमोर निर्माण झाला आहे. थोडक्यात फराळाची गोड चव चाखण्यापूर्वी ग्राहकांचे तोंड कडू झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जीएसटीमुळे कपडे, वस्तूंप्रमाणेच दिवाळीच्या फराळाचे भाव देखील 25-30 टक्क्यांनी वाढले आहेत.
यंदा दादर, परळमध्ये चिवडा 360 रुपये किलो, चकली 400 रुपये किलो, शंकरपाळे 240 रुपये किलो, बेसन लाडू 2200 रुपये शेकडा, मेथीचे लाडू 2200 रुपये शेकडा, करंजी 360 रुपये किलो, असे फराळाच्या पदार्थांचे दर अव्वाच्या सव्वा झाल्याचे पहायला मिळत आहे.
या जीएसटीचा फायदा घेत अनेकांनी दर प्रमाणापेक्षा अधिक वाढवलेले पहायला मिळत आहेत. गतवर्षी चिवडा 300 रुपये किलो, चकली 350 रुपये किलो, शंकरपाळे 200 रुपये किलो, बेसन लाडू 240 रुपये किलो, मेथी लाडू 240 रुपये किलो, करंजी 320 रुपये किलो या प्रमाणे बाजारपेठेत उपलब्ध होते. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा या फराळांच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
जीएसटीमुळे कच्चा माल महागला आहे. त्यामुळे या दिवाळीवर महागाईचे सावट आहे, असे म्हणायला हरकत नाही.
शंकर बाळासाहेब काळे, गिरणगावातील चिवडा विक्रेते
हेही वाचा -