आता पालघरसुद्धा दणकून घेऊ- संजय राऊत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कल हाती आल्याबरोबर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ''कर्नाटक जिंकलो मतदारांचे आभार! आता भंडारा जिंकू ठोकून आणि पालघर जिंकू ठासून!'', असं शिवसेनेला उद्देशून ट्विट केलं होतं. गुरूवारी विधान परिषदेसह स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेनं नाशिक, परभणी आणि हिंगोलीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेलारच्या या ट्विटला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

काय म्हणाले राऊत?

या विजयानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपासह इतर विरोधकांना टार्गेट केलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर केलेल्या ट्टिटमध्ये संजय राऊत यांनी नाशिक, परभणी आणि हिंगोली ठासून जिंकल्याचं सांगतानाच आता पालघर सुद्धा दणकून घेऊ, असं म्हणत शेलार यांना चिमटा काढला.

भाजपाच्या जिव्हारी

पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं भाजपातून शिवसेनेत आलेल्या श्रीनिवास वानगा यांनी उमेदवारी दिली आहे. तर भाजपानं काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. मुळात श्रीनिवास वानगा यांना शिवसेनेत घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं हे भाजपाच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं वारंवार भाजपा नेत्यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे.

पोटनिवडणूक प्रतिष्ठेची

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारच्या पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेतही वानगा हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न होता, त्यात नाक घुपसायंच शिवसेनेचं काम नव्हतं असं म्हणत हेच दाखवून दिलं. एकूणच काय तर भाजपानं आणि शिवसेनेनं दोघांनीही पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच शेलार असो वा संजय राऊत सर्वच नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.


हेही वाचा-

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दाखवला बेईमानीचा आरसा

निरंजन डावखरेंचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का


पुढील बातमी
इतर बातम्या