Advertisement

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दाखवला बेईमानीचा आरसा

मुख्यमंत्र्यांना बेईमानी वैगरे दिसत असेल तर राजभाषा कोश नव्यानं लिहावा लागेल, अशा शब्दांत शिवसेेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दाखवला बेईमानीचा आरसा
SHARES

चिंतामण वनगा हे मरेपर्यंत भाजपशी इमान राखूनच होते. त्यांच्या इमानदारीची किंमत मरणानंतर संपली आणि वनगा कुटुंबियांना जणू वाऱ्यावरच सोडून दिलं. त्यानंतर ते सर्व कुटुंब शिवसेना परिवारात सामील झाले. यात मुख्यमंत्र्यांना बेईमानी वैगरे दिसत असेल तर राजभाषा कोश नव्यानं लिहावा लागेल, अशा शब्दांत शिवसेेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.


'यालाच बेईमानी म्हणतात'

'चलन फाडून फेकणं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, परंतु, भाजप खासदार किरीट सोमय्या यांना वाचवण्यासाठी सरकार कामास लागते आणि वनगा कुटुंबियांना साधा फोन करायला कुणी तयार नाही. यालाच बेईमानी म्हणतात' असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना बेईमानीचा आरसा दाखवला.


'सामना'तून घेतला समाचार

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीय मधून चोख प्रत्युत्तर दिलं.

'चिंतामण वनगा आयुष्यभर आदिवासी पाड्यांवर भगवा ध्वज हाती घेऊन काम करत राहिले. मात्र त्यांची मरणोत्तर उपेक्षा करणे आणि राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचं राजकीय वारसदार बरं का, असं आता जाहीर सभांतून सांगणं यालाच बेईमानी म्हणतात साहेब!'


'मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडतात'

'मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत, पण सत्य आणि प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल. कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलालूंसारख्या धनदांडग्याचं काही चाललं नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असं बेईमान, भ्रष्ट रामलू पाचोळ्यासारखे उडून जातील'.


'याचाच प्रश्न तेवढा बाकी'

'एखाद्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री, इतर फौजफाटा साग्रसंगीत उतरत असतो, तसा फौजफाटा पालघरलाही उतरला आहे. मंत्रालय ओस पडलं आहे. महाराष्ट्राचे सर्व प्रश्न जणू सुटलेच आहेत आणि फक्त पालघरच्या पोटनिवडणुकीचा प्रश्नच तेवढा बाकी आहे, असं सत्ताधारी भाजपचं वागणं आहे'.


'अंतिम विजय शिवसेनेचाच'

'पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी थैल्या घेऊन त्यांनी मंत्रिमंडळच उतरवले आहे. मात्र अंतिम विजय हा शिवसेनेचाच होणार आहे. आम्हला आश्चर्य वाटतं ते भाजपने सुरू केलेल्या बेताल प्रचाराचं. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे भाजपकडून कोणी फिरकले नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण जिल्ह्यातील संघ आणि भाजप परिवाराने पाठ फिरवली'.

'वनगा यांचं निधन दिल्लीत झालं. त्यांच्या निवासस्थानापासून 'भाजप' कार्यालय पाच मिनिटांवर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं घर तीन मिनिटांवर. इतरही भाजप परिवार आसपास असतो. कोणी त्यांच्या पार्थिवावर फूल वाहण्यास गेले नाही', यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.


हेही वाचा -

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा