मुंबई-पुणे हे १५० किलोमीटरचं अंतर केवळ १४ मिनिटांत पार करता यावं यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर उभारणी होत असलेल्या 'हायपरलूप' प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात व्हर्जिन हायपरलूपच्या चाचणी केंद्राला भेट देऊन कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राॅब लाॅयड यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनुसार येत्या काही दिवसांत कंपनीची एक टीम पुण्यात येणार असून प्रकल्प पुढं नेण्याच्यादृष्टीनं काम करणार आहे.
ही माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली. तर या प्रकल्पाची जबाबदारी असणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) चे महानगर आयुक्त किरण गीते यांनी देखील 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना याला दुजोरा दिला.
'एक्स्प्रेस वे' मुळे मुंबई-पुणे हे १५० किमीचं अंतर अडीच ते ३ तासांवर आलं आहे. असं असलं या दोन शहरांमधील दरी आणखी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हायपर लूप प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे अंतर अवघ्या १४ मिनिटांत स्वप्नवतरित्या पार करता येणार आहे.
डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ताशी १००० किमी वेगानं गायब होणारी हायपरलूप मुंबई-पुणे मार्गावर प्रत्यक्ष साकारण्यासाठी ७ महिन्यांपूर्वी राज्य सरकार आणि व्हर्जिन कंपनीमध्ये करार झाला होता. ५ महिन्यांपूर्वी कंपनीनं प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण करत एक अहवाल पीएमआरडीएकडं सादर करत प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर शिक्कामोर्तब केलं.
आता त्यापुढं जात अभियंत्यांचा समावेश असलेली कंपनीची टीम पुणयात येऊन प्रकल्प पुढे नेण्याचं काम करणार आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प दृष्टीक्षेपात असल्याची चर्चा आहे.
पीएमआरडीएनं हा प्रकल्प पुढं नेण्याच्यादृष्टीनं पहिल्या टप्प्यात १५ किमीचा डेमोन्ट्रेशन ट्रॅक अर्थात प्रायोगिक मार्ग निश्चित केल्याचीही माहिती समोर येत आहे. तर या हायपरलूप तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी २० टक्के सामग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातूनच उपलब्ध करून दिलं जाणार आहेत.
हेही वाचा-
'हायपर' गर्दीवर 'हायपरलूप'चा उतारा, मुंबई ते पुणे १४ मिनिटांत शक्य
मुंबई-पुणे 14 मिनिटांत पोहोचवणारी हायपरलूप आहे तरी काय?