मुंबईहून पुणे गाठण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्गाने किमान ३ तास लागतातच. जवळपास १५० किलोमीटरचं हे अंतर भविष्यात फक्त २० मिनिटांत कापता येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत राज्य सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (आशय पत्र) वर स्वाक्षरी केली आहे.
त्यानुसार पहिला हायपरलूप मार्ग मध्य पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचं नुकतच भूमीपूजन करण्यात आलं आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग १ हजार किमी असेल, अशी माहिती व्हर्जिन हायपरलूपचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत दिली.
या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप वन (व्हीएचओ) सोबत राज्य सरकारने करार केला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि व्हर्जिन हायपरलूपमध्ये ३ महिन्यांपूर्वी एक करार झाला होता. या करारानुसार हा प्रकल्प व्यवहार्य आहे का? आणि असेल तर हा प्रकल्प कशाप्रकारे प्रत्यक्षात आणता येईल? याचा अभ्यास करत यासंबंधीचा सविस्तर अहवाल ६ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवाल नुकताच सादर केला होता.
हेही वाचा-
कॅ. अमोल यादव यांना विमाननिर्मितीसाठी पालघरमध्ये जागा, एमआयडीसीसोबत करार