अभिनेता शाहरुख खान कोरोनाव्हायरस विरूद्ध लढ्यात मदतीसाठी पुढे येतोय. आता त्यानं महाराष्ट्र शासनाला २५ हजार वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) किट उपलब्ध करुन दिली आहे. जेणेकरून राज्यभरातील मेडिकल टीमची सुरक्षा होऊ शकेल. या योगदानाबद्दल सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी त्याचे आभार मानले आहेत.
'शाहरुख खान यांनी २५ हजार पीपीई कीट देऊन जो मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल', असं ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
शाहरुखनंही त्यांचे आभार मानत म्हटलं की, सध्याच्या काळात सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. ‘या किट्ससाठी तुम्ही जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. मानवजातीच्या सुरक्षेसाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढुयात. तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमची टीम आणि कुटुंबसुद्धा निरोगी आणि स्वस्थ राहू दे’, असं ट्विट शाहरुखनं केलं आहे.
यापूर्वी, शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांनी वांद्रे इथली त्यांची चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी मुंबई महापालिकेला दिली आहे. शाहरुख आणि गौरीनं मदतीचा हात पुढे केल्यानं महापालिकेनं त्यांचे विशेष आभार मानले होते.
याशिवाय शाहरुखनं आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX कडून सात संस्थांना निधी देत असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबाना तसंच १० हजार लोकांना जेवण, रुग्णालयांसाठी २००० जणांचं जेवण, दिल्लीतील २ हजार ५०० रोजंदारी कामगार आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामान इतकी मदत शाहरुखनं जाहीर केली आहे.
हेही वाचा