'पद्मावती'ला होणारा विरोध दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. पण सध्या संजय लीला भन्साळी यांना मात्र सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 'पद्मावती' विरोधावरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला चांगलच फटकारलं आहे. न्यायालयानं 'पद्मावती' चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावत सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
'पद्मावती' चित्रपटाचा निषेध करणाऱ्या राजकीय नेत्यांचा देखील सुप्रीम कोर्टानं चांगलाच समाचार घेतला. 'चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मंत्र्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचं उल्लंघन केल्यासारखं आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या प्रक्रियेवर दबाव येऊ शकतो. चित्रपटावर चर्चा झालीच पाहिजे. पण चित्रपट न पाहताच त्याचा विरोध करणं किंवा त्यावर प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे,' अशा शब्दांमध्ये न्यायालयानं विरोधकांना फटकारलं.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला राजपूत संघटनांचा विरोध आहे. यासोबतच कर्णी सेना आणि राजकीय पक्ष देखील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश इथं चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. राणी पद्मावतीची कथा चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. प्रदर्शनाविरोधात वकिल मनोहरलाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
हेही वाचा