Advertisement

मॅग्नेटिकमध्ये भरला महिला उद्योजकांचा मेळावा...


मॅग्नेटिकमध्ये भरला महिला उद्योजकांचा मेळावा...
SHARES

देशाच्या उभारणीत महिला खूप मोठे योगदान देऊ शकतात, त्यासाठी त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळीवर प्रोत्साहन मिळणे गरजेचं आहे, असे मत महिला उद्योजकांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये भरलेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आलं. महिलांना उद्योग क्षेत्रात करिअर करावयाचं असल्यास त्यांनी स्वत:ला कोणत्याही पातळीवर कमी न समजता पूर्ण आत्मविश्वासाने आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करत वाटचाल करणे गरजेचं आहे, असं मतही यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

मॅग्नेटीक महाराष्ट्र परिषदेत मंगळवारी यासंदर्भात आयोजित चर्चासत्रात कॅनडाच्या लघुउद्योग आणि पर्यटन मंत्री बर्दीश छग्गर, भारतातील स्विडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन, मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमिरा शाह, मल्टिप्लेस अल्टर्नेट असेट मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणुका रामनाथ, इस्त्रोच्या उप प्रकल्प संचालक मिनल संपथ, हे दिदीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय, ॲमेझॉन कंपनीच्या संचालक अर्चना वोरा यांनी सहभाग घेतला.


महिलांसाठी विविध क्षेत्रातील प्रशिक्षण आवश्यक

भारतातील स्विडीश चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रमुख सारा लार्सन यावेळी म्हणाल्या, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिकता आणि मानसिकतेत बदल आणावा लागेल. महिला या उद्योजक किंवा एखाद्या संस्थेच्या प्रमुख किंवा नेत्या कशा बनू शकतील यासाठी हा बदल गरजेचा आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच हे शक्य होणार आहे. महिलांसाठी विविध क्षेत्राच्या प्रशिक्षणावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहभाग वाढायला हवा

इस्त्रोच्या उप प्रकल्प संचालक मिनल संपथ यांनी यावेळी इस्त्रोमार्फत राबवण्यात आलेल्या मिशन मंगलयान मोहीमेविषयी माहिती दिली. या मोहिमेत महिला वैज्ञानिकांचा महत्त्वाचा सहभाग होता. सुमारे 40 महिला वैज्ञानिकांनी या मोहिमेच्या यशात योगदान दिले, असे त्यांनी सांगितले. महिलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणे गरजेचं आहे. युनेस्कोच्या सर्वेक्षणानुसार भारतात फक्त 14 टक्के इतक्या महिला संशोधक आहोत. जागतिक पातळीवर हे प्रमाण 28.4 टक्के इतके आहे. महिलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहभाग वाढणे गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


महिलांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी

‘दिदीच्या’ मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती रॉय यांनी सुरुवातीला आपण टॅक्सी चालक म्हणून काम सुरू केलं. आपल्या या यशस्वी व्यावसायिक वाटचालीत मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान राहिले. टॅक्सी ड्रायव्हर म्हणून आपण मुंबईतूनच या करिअरची सुरुवात केली, असे रेवती रॉय यांनी सांगितले. महिला उद्योजकांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


महिला उद्योजकांसाठी ई-पोर्टल

ॲमेझॉन कंपनीच्या संचालक अर्चना वोरा यांनी त्यांच्या कंपनीमार्फत खास महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ॲमेझॉन सहेली या ई - कॉमर्स पोर्टलविषयी माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 20 हजार महिला व्यावसायिक निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा