गेल्या काही वर्षापासून राज्यात कुपोषित बालकांची संख्या वाढती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष वेधत राज्यात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबवलं. यावेळी ९८.५० टक्के अंगणवाड्यांची तर त्यातील ९०.४७ टक्के बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असं आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आलं आहे. वर्षातून दोन सत्रांमध्ये ही तपासणी केली जाते.
राज्यामध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. त्यासाठी ९९३ पथके कार्यरत आहेत. त्यात एक पुरुष आणि एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका आणि औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा समावेश असतो.
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत एकूण एक लाख ३ हजार ३४४ अंगणवाड्या आणि त्यातील ७२ लाख ७४ हजार ५४३ बालकांचं तपासणी उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आलं आहे. पहिल्या सत्रात एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ९८ हजार २९ (९४.८६ टक्के) अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ६२ लाख २० हजार ४९८ (८५.५१ टक्के) बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४ लाख ६३ हजार ११७ किरकोळ आजारी असलेल्या बालकांवर औषधोपचार करण्यात आले आहेत.
दुसऱ्या सत्रात ऑक्टोबर २०१७ ते मार्च २൦१८ या कालावधीत १ लाख १ हजार ७९० (९८.५൦ टक्के) अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली असून ६६ लाख ४൦ हजार ८०० (९൦.४७ टक्के) बालकांची तपासणी करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान आढळून आलेल्या आजारी बालकांवर औषधोपचार केले जातात. गंभीर स्वरुपाच्या आजारी बालकांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे पाठवले जाते. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियाही केली जाते. हे सर्व उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.
हेही वाचा -