दीड वर्षांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला चेंबूरचा अमर महल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात हा पूल बंद करण्यात आला होता. १८ महिने हा पूल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र, आता या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली असल्यामुळे या उड्डाणपुलावरून प्रवास सुखकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार?
दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद केल्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मे महिन्यात या उड्डाणपुलावरील एक बाजू खुली करण्यात आली होती. मात्र तरीही ठाण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती.
दीड वर्षांनंतर या पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.