राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली संख्या ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच प्रयोगशाळा होत्या. सद्यस्थितीत प्रयोगशाळांची संख्या ११० वर जाऊन पोहोचली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण जगावर कोरोनाचं मोठं संकट असून आपला देश व आपलं राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचं सांगत या लढ्यात आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत असून या सर्वांचं कार्य कौस्तुकास्पद व अभिनंदनीय असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा - मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांवर
याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बी.एस.एल.-३ या आधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करुन रुग्णांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणू, जीवंत राहू शकणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.
कोव्हिड बरोबरच या प्रयोगशाळेत अनुवंशिकते संबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपणांस दररोज लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवासितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करुन कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच कोव्हिड बाधितांवर तातडीने उपचार करणं सोयीचे होणार आहे तसंच प्लाझ्मा थेरपी व ॲन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचंही पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले की, जालना जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. १ कोटी ७ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून दररोज ५०० तपासण्या केल्या जातील.
हेही वाचा - वसईतही होणार कोरोना चाचणी