मुंबई महापालिकेच्या देवनार कत्तल खान्यातून बकरी ईदसाठी सेवा सुविधा पुरवण्यात येत असल्या, तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत बकऱ्यांवरील खर्च तिपटीने वाढला आहे. शेळया व मेंढ्यांपासून उत्पन्न घटत चालले असून खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे सध्या बकरे कापण्यासाठी वर्षाला 8 कोटी रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईकरांना स्वच्छ आणि ताज्या मांसाचा पुरवठा करण्यासाठी, तसेच पशुवधानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रीयदृष्टया विल्हेवाट लावण्यासाठी, तसेच मुंबईत येणाऱ्या जनावरांसाठी एकाच ठिकाणी बाजार उपलब्ध करून देण्यासाठी देवनार पशुवधगृह बनवण्यात आले. देवनार कत्तलखाना म्हणून हा ओळखला जात असून दैनंदिन पशुवधाव्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांशी निगडीत असलेल्या बकरी ईद सणाचेही व्यवस्थापन केले जाते.
देवनार कत्तलखान्यात दरवर्षी सुमारे पावणे दोन ते दोन लाख शेळ्या, मेंढ्या बकरी ईद निमित्ताने याठिकाणी आणल्या जातात. यासाठी निवारा शेड, पाण्याची व्यवस्था करणे, साफसफाईची कामे करणे, म्हशींच्या धार्मिक वधाची व्यवस्था करणे अशाप्रकारे बकरी ईदपूर्वीचे 12 दिवस, बकरी ईदचा दिवस आणि नंतरचे 2 दिवस असे 15 दिवस व्यवस्था पार पाडली जाते.
ही सुविधा पुरवताना महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा पडत असतो. गेल्या दोन 2 बकरी ईद संणांपासून शेळ्या व मेंढ्यांच्या धार्मिक वधाकरता घरी घेऊन जाण्याकरता देण्यात येणारे पासही स्थायी समितीच्या मंजुरीने नि:शुल्क करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सन 2014पासून यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुमारे एक ते दीड कोटींनी घट झालेली आहे, असे पशुवधगृहाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बकरी ईदच्या दिवसात देवनार पशुवधगृहात विक्रीकरता आलेल्या शेळया व मेंढ्या तसेच म्हैस, रेडे, म्हशींचे पाडे याकरता प्रत्येकी 100 रुपये इतके प्रशासकीय तथा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
हेही वाचा