
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दिवाळी तसेच छठ पूजेच्या सणानिमित्त प्रवास सुलभ व्हावा म्हणून रेल्वेने 12,011 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांमुळे देशभरातील विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या १ कोटीहून अधिक प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, या विशेष गाड्यांपैकी 1,998 दिवाळी स्पेशल फेऱ्या (राखीव आणि अनारक्षित दोन्ही) मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जात आहेत. या गाड्यांमुळे 30 लाखांहून अधिक प्रवाशांना बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये प्रवास करणे सोयीचे होईल.
सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने व्यापक तयारी केली आहे. देशभरातील 16 झोनमधील 76 प्रमुख स्थानकांवर प्रभावी गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष ‘होल्डिंग एरिया’ तयार किंवा नियोजित करण्यात आले आहेत.
महाव्यवस्थापकांनी सांगितले की, मध्य रेल्वेने गर्दी नियंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), दादर, पुणे, नाशिक रोड आणि नागपूर या सहा प्रमुख स्थानकांवर प्रवाशांसाठी विशेष होल्डिंग एरिया उपलब्ध करून दिले आहेत.
• CSMT येथे – 1,200 चौ. मी. क्षेत्रफळात होल्डिंग एरिया तयार
• LTT येथे – 10,000 चौ. मी. क्षेत्रफळात होल्डिंग एरिया
• पुणे स्टेशन येथे – 2,000 चौ. मी. क्षेत्रफळात होल्डिंग एरिया
• नाशिक रोड येथे – 1,000 चौ. मी. क्षेत्रफळात होल्डिंग एरिया
• नागपूर येथे – 1,500 चौ. मी. क्षेत्रफळात होल्डिंग एरिया तयार
या होल्डिंग एरियामध्ये एकावेळी सुमारे २०,००० प्रवासी थांबू शकतात.
गर्दी नियंत्रण आणि प्रवासी सुविधांसाठी घेतलेली पावलेया ठिकाणी छप्पर, प्रकाशव्यवस्था, वायुवीजन, पिण्याचे पाणी, पंखे, स्वच्छतागृहे, चार्जिंग पॉइंट, खाद्यपदार्थांची स्टॉल्स आणि पब्लिक अॅड्रेस सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे.
गाड्यांचे प्लॅटफॉर्म आधीच निश्चित करण्यात आले आहेत आणि त्यात कोणताही बदल केला जाणार नाही.
गर्दी टाळण्यासाठी दोन गर्दीच्या गाड्या एकाच बेट प्लॅटफॉर्मवर न आणण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांच्या वेळा आणि इतर महत्त्वाच्या माहितीबाबत नियमित घोषणा केली जात आहे.
आरपीएफ (RPF) आणि रेल्वे कर्मचारी यांच्या देखरेखीखाली प्रवाशांसाठी शिस्तबद्ध रांगा तयार केल्या जात आहेत.
AI आणि वॉर रूम्सच्या मदतीने तिकिटांची उपलब्धता आणि प्रवासी हालचालींचे रिअल-टाईम मॉनिटरिंग केले जात आहे.
प्रवाशांच्या मदतीसाठी पुरेसे कॉमर्शियल आणि टीसी कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत.
प्रमुख स्थानकांवर आरपीएफ आणि जीआरपी यांच्यात संयुक्त समन्वय ठेवला जात आहे, जेणेकरून प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू नये.
हेही वाचा
