Advertisement

कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन सुरूच राहणार


कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन सुरूच राहणार
SHARES

समान काम, समान वेतन या मागणीसाठी महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन माळी व कामगार संघटना यांच्यात 24 मे रोजी झालेली बैठक असफल ठरली आहे. त्यामुळे 22 मे पासून राज्यभरात सुरू असलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती पॉवर फ्रंट संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

या आंदोलनात आठ संघटना मिळून 32 हजार कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या 32 हजार कंत्राटी कामगारांना शासनाने नेमलेल्या रानडे समितीच्या अहवालानुसार कायम करण्यात यावे. कायम होईपर्यंत त्यांना रोजंदार कामगार पद्धतीनुसार कामावर घेऊन शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

24 मे रोजी प्रकाशगड मुख्यालय येथे माळी यांच्याशी समितीच्या लोकांनी चर्चा केली असता, समान काम समान वेतन समितीचा अहवाल 30 दिवसांत शासनाकडे पाठविण्याच्या दृष्टीने वेगात कारवाई होईल, असे माळी यांनी आश्वासन दिले होते. यावेळी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र कंत्राटी कामगारांची मला आवश्यकता नाही, मी नियमित कामगारांकडून काम चालवू शकतो, या माळी यांच्या विधानांमुळे कंत्राटी कामगारांमध्ये नाराजी पसरली असल्याचे राव यांनी सांगितले.  यावेळी पॉवर फ्रंट संघटनेचे सहसचिव नचिकेत मोरे, कंत्राटी कामगार कृती समितीचे सरचिटणीस कृष्णाजी भोयर आदी उपस्थित होते.

राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी सर्व विभागांची बैठक बोलावून त्यावर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे. अन्यथा कंत्राटी कामगारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 30 मे पर्यंत निर्णय न झाल्यास 97 हजार कायम स्वरूपी असणारे कामगार काळ्या फिती लावून कंत्राटी कामगारांना पाठिंबा देणार आहेत. तरीसुद्धा ही मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन उकाडयात राज्यात विजेचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण होणार आहे.

शशांक राव, अध्यक्ष, पॉवर फ्रंट संघटना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा