कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे महाराष्ट्रातील तिघे जण इराण बोटीवर अडकले आहेत. या बोटीवरील 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या तरुणांची सुटका करण्यात यावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
इराणमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अबादान बंदरातील बोटीवरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. बोटीमधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे ठाण्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील तिघे जण बोटीवरच अडकले आहेत. आखातातील अमिर बोटीवर महाराष्ट्रातील विवेक विष्णू माळकर (किसननगर, ठाणे) सौरभ शशिकांत पिसाळ (भांडुप) आणि अॅंथोनी जॉन पॉल (कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. या बोटीवर एकूण 33 कर्मचारी कार्यरत होते. 30 कर्मचारी इतर देशातील आहेत. त्यांची त्यांच्या देशांनी सुुटका केली आहे. 8 दिवसांपासून अमिर बोट गोदीतच तळ ठोकून आहे.या तरुणांची बोटीतून सुटका करण्यासाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही पत्र पाठवून विवेक माळकर यांच्या कुटुंबीयांनी मदतीची विनंती केली आहे.
हेही वाचा -