मुंबई (mumbai) ठाण्यासह लगतच्या परिसरात पावसाने रविवारपासून जोरदार हजेरी लावली आहे. अजूनही पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता होती. मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणसह पालघरमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा बसत होत्या मात्र पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद अनुभव दिला आहे. पण सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकलसेवेवरही परिणाम दिसू लागला आहे. मुंबईतील मध्य, पश्चिम, आणि हार्बर रेल्वेवर गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
दक्षिण मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. संततधारेमुळे आणि वाऱ्याची गती वाढल्याने दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे, रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्याने रस्ते जलमय झाले आहेत. ठाण्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे.
तसेच कल्याण-डोंबिवलीतही सकाळपासून ढग दाटले असून रिमझिम सरी बरसत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कामाला पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यात कमाल तापमानात घट झाली आहे. परिणामी मुंबई ठाण्यासह (thane) लगतच्या परिसरात असेच वातावरण कायम राहणार असून आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
तर रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (heavy rains) पडणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होता. आता दोन्ही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहरात सरासरी 87.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व मुंबईत 45.60 मिमी आणि पश्चिम मुंबईत 67.73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ठाण्यात मिमी पाऊस झाला आहे. तसेच मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे.
हेही वाचा