Advertisement

महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा - अस्लम शेख

कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते.

महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा - अस्लम शेख
SHARES

मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा, अशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महापालिका आयुक्ता इक्बाल सिंग चहल यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे.

'ठराविक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना बदलीपात्र असूनही महापालिकेतील पदाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेनं काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं चित्र मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत सर्रास पहायला मिळतं', असं अस्लम शेख यांनी पत्रात म्हटलं आहे.

'कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत असल्याने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने आणि काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळं वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी. ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करावी, असंही अस्लम शेख यांनी या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा