डिसेंबर महिन्याच्या पंधरवड्यात मुंबईत थंडीचं आगमन झालं. सकाळी उकाडा आणि रात्री थंड अशा वातावरणामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला होती. परंतु, २५ डिसेंबर रोजी म्हणजेच नाताळच्या दिवशी मुंबईत पावसानं हजेरी लावली. मुंबईत बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दरम्यान या उन, थंडी व पाऊस अशा वातावरणामुळं हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून, मुंबईकरांच्या तब्येतीतही बिघाड होत आहेत.
मुंबईत बुधवारी असलेलं ढगाळ वातावरण हे गुरुवारीही कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, शुक्रवारनंतर याचा प्रभाव कमी होणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिली. गुरुवारी ढगाळ वातावरणासोबतच पुन्हा एकदा पावसाच्या हलक्या थेंबांच्या उपस्थितीचीही शक्यता आहे. बुधवारी दिवसभर वातावरणामध्ये धूलिकणांचंही प्राबल्य अधिक होते.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळं किनारपट्टीच्या भागामध्ये आर्द्रतेचा पुरवठा होत आहे. हे उष्ण आणि दमट वारे तसंच, उत्तरेकडून येणारे थंड आणि शुष्क वारे यांची मिलापरेषा ही महाराष्ट्रावर आहे. त्यामुळं ढगाळ वातावरणाची निर्मिती होते. परिणामी मुंबईतील पावसाची उपस्थिती तसंच धुळे, औरंगाबाद, पुणे, पिंपरी, चिंचवड या ठिकाणीही पाऊस असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
गुरुवारी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सांताक्रूझ इथं बुधवारी ३०.६ कमाल तापमान नोंदलं गेलं, तर कुलाबा इथं ३० अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदलं गेलं. सांताक्रूझ इथं आर्द्रता ७४ टक्के होती, तर कुलाबा इथं पावसाळ्याप्रमाणं तब्बल ८८ टक्के आर्द्रता होती. सांताक्रूझ इथं २४ तासांमध्ये त्यामुळं कमाल तापमानात १.४ अंशांची घट झाली आहे, तर कुलाबा इथं ही घट २.६ अंशांची आहे. तापमानात घट झाल्यानं वातावरणात उकाडा खूप जाणवला नाही तरी आर्द्रतेमुळं तापमान खाली उतरल्याचा अपेक्षित दिलासाही मिळाला नाही.
हेही वाचा -
गुरुवारच्या रणजी मॅचवर 'ग्रहण'
टॅरीफ दरात दरवाढ होण्याची शक्यता