Advertisement

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असून, गेल्या काही दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे.

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असून, गेल्या काही दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. एकूण रुग्णसंख्येनं साडेपाच हजारांचा आकडा पार केला आहे. मृतांचे प्रमाण मात्र तुलनेनं कमी आहे. दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो. १६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २५५४ होती. पुढील पाच दिवसांतच म्हणजे २१ ऑगस्टला रुग्णांची संख्या ४९९७ वर गेली. सप्टेंबर महिना सुरू झाला तसा डेंग्यूचा कहर आणखीनच वाढला असून ७ सप्टेंबरला राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५७४६ पर्यंत गेली आहे.

गेल्या वर्षी करोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात होते, तर डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. परंतु, या वर्षी कोरोनासह डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. गतवर्षी ३३५६ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते, तर १० जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्येने साडेपाच हजारांचा टप्पा गाठला आहे. आत्तापर्यंत डेंग्यूमुळं राज्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून नागपूरमध्ये मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात मिळून ६, तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, नगर इथं प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रांमध्ये हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे आढळले आहे. घराघरांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या महानगरपालिकेला ५० तर ग्रामीण आणि छोट्या नगरपालिकांमध्ये २५ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सप्टेंबरपासून सर्वेक्षण सुरू झाले असून घराजवळील परिसरांमध्ये डासांची उत्पत्तीस्थानं नष्ट करणं हे प्रामुख्यानं या स्वयंसेवकांचे काम असते. यामुळे आता वेगानं प्रादुर्भाव रोखण्याचं काम सुरू झालं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा