महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने जिल्हानिहाय रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोनची यादी जाहीर केली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला देशव्यापी लाॅकडाऊन ४ मे रोजी संपल्यानंतर राज्यात झोननुसार मोकळीक देण्यात येईल, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितलं.
‘असे’आहेत झोन्स
महाराष्ट्रातील 'रेड झोन'ची यादी | महाराष्ट्रातील 'आॅरेंज झोन'ची यादी | महाराष्ट्रातील 'ग्रीन झोन'ची यादी |
मुंबई | रायगड | उस्मानाबाद |
मुंबई उपनगर | अहमदनगर | वाशिम |
ठाणे | अमरावती | सिंधुदूर्ग |
पालघर | बुलडाणा | गोंदीया |
पुणे | नंदूरबार | गडचिरोली |
नाशिक | कोल्हापूर | वर्धा |
नागपूर | हिंगोली | |
सोलापूर | रत्नागिरी | |
यवतमाळ | जालना | |
औरंगाबाद | नांदेड | |
सातारा | चंद्रपूर | |
धुळे | परभणी | |
अकोला | सांगली | |
जळगाव | लातूर | |
भंडारा | ||
बीड |
महाराष्ट्रात ३० एप्रिल २०२० पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजार ४९८ इतकी आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांनी ७ हजारांचा आकडा गाठला आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आतापर्यंत कोरोनाने मृत पावलेल्यांची संख्या आता ४५९ इतकी झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्रीन,ऑरेंज आणि रेड झोनबाबतही (red zone) महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ते म्हणाले की, कामं सगळ्यांचीच अडली आहेत. याची मला कल्पना आहे. त्यामुळे हळुहळू सर्व कामं सुरू करण्यात येतील, पण त्यात कुठलीही गडबड होता कामा नये, नाहीतर आतापर्यंतची आपली सर्व तपश्चर्या वाया जाईल. ३ मे नंतर राज्यातील काही भागात झोननुसार मोकळीक देण्यात येईल. यापैकी ग्रीन झोनमध्ये अटी काहीशा शिथील केल्या जातील. मात्र रेड झोनमध्ये अद्याप धोका कायम असल्याने या भागात बंधने कायम ठेवण्यात येतील.
त्यानुसार मुंबई - ७०६१, ठाणे- ४६०, कल्याण-डोंबिवली १६३, वसई-विरार १२८, मिरा-भाईंदर- १२६, पालघर- ४१, नवी मुंबई- १७४, पनवेल- ४७, पुणे शहर- १११३, पुणे ग्रामीण- ६३, पिंपरी-चिंचवड ७२, नागपूर-१३१, औरंगाबाद- १३१ असे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने या रेड झोडमध्ये सध्या तरी लाॅकडाऊन शिथील होण्याची चिन्हे नाहीत.
लाॅकडाऊनचा फायदा काय?
राज्यात रुग्ण तर वाढतच आहेत. मग लाॅकडाऊनचा नेमका फायदा काय झाला? असे काहीजण विचारत आहेत. पण हे लक्षात घ्या की या लाॅकडाऊनने कोरोना संसर्गात गतीरोधकाचं काम केलं आहे. सर्कीट ब्रेकर म्हणजेच श्रृंखला तोडण्याचं काम केलंय. तसं नसतं तर महाराष्ट्रात आजघडीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या भयंकर असती, ती गुणाकार पद्धतीने वाढली असती. सध्या ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आहेत, ते सुरूवातीच्या काळात कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपासून वाढलेले आहेत. त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करून आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.