Advertisement

शाळा सुरू करताना दरदिवशी एक वर्ग भरवण्याचा विचार- मुख्यमंत्री

शाळा वेगवेगळ्या सत्रात भरविणं, दर दिवशी एक वर्ग भरविणं असे पर्याय अजमावून पाहण्यात येत आहे. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

शाळा सुरू करताना दरदिवशी एक वर्ग भरवण्याचा विचार- मुख्यमंत्री
SHARES

कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा (lockdown) मोठा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही पडला आहे. ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना घरात बसावं लागलं असून  यापुढच्या शैक्षणिक वर्षाची चिंता देखील पालक आणि विद्यार्थ्यांना सतावू लागली आहे. या अवघड स्थितीत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे (digital education) जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देण्याचा शासकीय स्तरावरही प्रयत्न होत आहे. यापुढच्या काळात ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

दरदिवशी एक वर्ग

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना आवश्यक खबरदारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. शाळा वेगवेगळ्या सत्रात भरविणं, दर दिवशी एक वर्ग भरविणं असे पर्याय अजमावून पाहण्यात येत आहे. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आणि पालक-विद्यार्थी यांच्या समन्वय असावा, सर्वांचे विचार विचारात घ्यावेत. सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आपण  पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा - राज्यातील शासकीय शाळांच्या दर्जात सुधारणा

अभ्यासक्रम छोटा

शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावं. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड द्यावं, ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा  यासाठी उपयोग करून घ्यावा व यानिमित्ताने ऑनलाईन नेटवर्कही बळकट करून घ्यावं, शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचीही सहकार्य घेण्यात यावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.  

पीडीएफ पुस्तके

यावेळी बोलताना शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देताना सांगितलं की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा अॅपचा वापरही  वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.  गुगल क्लास रूमचा तसंच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसंच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचं तसंच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक  व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. 

हेही वाचा- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना खडा सवाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा