माथाडी कायदा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील माथाडी कामगार संघटनांनी मंगळवारी काम बंदची हाक दिली आहे. यामुळे मंगळवारी राज्यातील बाजारापेठांमध्ये सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळत असून सर्व व्यापार थंडावलेला आहे. माथाडी कामगारांच्या हिताविरुद्ध काढलेले शासन निर्णय रद्द करावेत आणि इतर काही मागण्यांसाठी आझाद मैदानात एक दिवसीय उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणला मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार सहभागी झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून माथाडी कामगारांची परिस्थिती बिकट होत चालली असून सरकार मात्र आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास तयार नाही. तेव्हा सरकारला जागं करण्यासाठी हा एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून विविध मागण्यांसाठी सर्व कामगार आझाद मैदानात एक दिवशीय उपोषणाला बसले आहेत.
या उपोषणास बाबा आढाव, कामगार नेते बलवंत राव पवार, दादासाहेब मोरे यांसह विविध पदाधिकारीही उपोषणला बसले. याबाबत चर्चेसाठी माथाडी कामगार शिष्टमंडळ लवकरच मंत्रालयात जाणार असल्याची माहिती कामगार नेते बलवंत राव पवार यांनी दिली.