मुंबईतील जलवाहिनींवर सुमारे सव्वातीन लाख स्वयंचलित जलमापके (एएमआरआय) बसवण्याचा निर्धार करणाऱ्या महापालिकेला ही योजनाच बासनात गुंडाळावी लागली असून आता पुन्हा मेकॅनिकल जलमापकांकडेच वळावं लागलं आहे. मुंबईतील जलवाहिन्यांवर केवळ ९० हजार स्वयंचलित जलमापके बसवण्यात आलेली असून उर्वरित जलवाहिन्यांवर रहिवाशांना जलजोडणी देताना मेकॅनिकल जलमापके बसवण्यात येत आहेत.
महापालिकेकडून मुंबईला दरदिवशी ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दिलेल्या जलजोडण्यांवर सुमारे सव्वातीन लाख जलमापके बसवण्यात आली आहेत. पण या जलमापकांपैकी निम्म्यापेक्ष अधिक जलमापके बंद असल्यामुळे महापालिकेने अंदाजित दरावर बिले बनवली जात होती. त्यामुळेच सन २००८-०९ स्वयंचलित जलमापके बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आतापर्यंत जलजोडण्यांवर केवळ ९० हजार ३३४ स्वयंचलित जलमापके बसवण्यात आली असल्याची माहिती समोर आली असून आता याऐवजी मेकॅनिकल जलमापकेच बसवली जात आहे. ही मेकॅनिकल जलमापके जलजोडणी घेणाऱ्यांनाच खरेदी करून बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उपायुक्त(जल विभाग) रमेश बांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी अधिक माहिती दिली. "स्वयंचलित जलमापके ही सर्वच जलजोडण्यांवर बसवली जाणार होती. परंतु या जलमापकांची चोरी झोपडपट्टी भागांमधून होत असल्यामुळे अत्यंत महागडी असलेली ही स्वयंचलित जलमापके तिथे न लावण्याचा निर्णय घेण्यात आला," असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा