आरे कॉलनीतील मेट्रो ३ या प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. मात्र, या कारशेडला पर्यावरणवादी संघटना यांच्यासह अनेक मुंबईकर विरोध करत आहेत. राजकीय पक्षही याला विरोध करत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कॉंग्रेसही आता विरोध करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला राज ठाकरे यांनी 'मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आपल्या सत्तेचा वापर करून केंद्र तसंच राज्य सरकारला हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडावं’, असं आवाहन रविवारी आझाद मैदानात केले.
त्याशिवाय, याच मुद्द्यावर मुंबई विभागीय काँग्रेसतर्फे गोरेगावच्या आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राज्य सरकारनं त्या वादग्रस्त निर्णयाचा फेरविचार करावा, अथवा संपूर्ण मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिला आहे.
गोरेगाव येथील आरे कॉलनीत मेट्रोचं कारशेड उभारण्यासाठी २ हजारांहून अधिक झाडं कापण्यात येणार आहेत. त्यामुळं याला विरोध करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात रविवारी शर्मिला ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी सहभागी घेतला होता.
'मुंबई पहिल्या ५ प्रदूषित शहरांमध्ये आहे. इथं प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अशावेळी प्राणवायू देणारी झाडं तोडणं म्हणजे लोकांना ऑक्सिजन मास्क घेऊन फिरावं लागणार. आमचा मेट्रोला विरोध नाही. विकासकामं करा पण झाडं तोडायची नाहीत', असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. तसंच, 'दुसरीकडं जागा असताना आरेमध्येच कारशेड कशाला हवी’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेह वाचा -
यंदा मुंबईसह राज्यभरात विक्रमी पावसाची नोंद