मुंबईतील गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुषखबर आहे. एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
भाडेवाढ का केली होती?
मुंबई आणि उपनगरातील चाकरमानी- प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल 5 हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केली आहे.
विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृतज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात.
तथापि, प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो.
हा तोटा काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर 30 टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु मुंबईकरांच्या तीव्र भावना तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनंतर एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.
हेही वाचा