दक्षिण मुंबईतील नागपाडा जंक्शनवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर आता मोकळ्या चौकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भारताचा तिरंगा लावण्यात येणार आहे. हा झेंडा अाता मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात उंच तिरंगा ठरणार अाहे.
भायखळा येथील नागपाडा जंक्शनवरील वाढीव बांधकामे आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. महापालिकेच्या ई विभागाच्या वतीने येथील सर्व अनधिकृत बांधकामं तसेच फेरीवाल्यांना हटवून हा परिसर मोकळा करण्यात आला. त्यानुसार मुंबई शहराच्या सौदर्यांत भर टाकण्याच्या उद्देशाने ई विभाग कार्यालयाने नागपाडा जंक्शनच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले अाहे. स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनीही यासाठी मोठा पुढाकार घेतला होता.
नागपाडा जंक्शनला ऐतिहासिक वारसा असून या चौकाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिझ कॉन्ट्रॅक्टर यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार त्यांनी या चौकाच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार केला असून त्यानुसार कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आहे. सुमारे सव्वापाच कोटी रुपये खर्च करून या चौकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
नागपाडा चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. इथली अतिक्रमणे हटवून तसेच वाढीव बांधकामे तोडून चौकाची जागा मोकळी करण्यात आली आहे. या चौकाच्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज बसवण्यात येणार आहे. तब्बल २५ मीटर इतका उंच हा भारतीय ध्वज असणार अाहे. वांद्रे इथं मुंबईतील सर्वात उंच तिरंगा फडकवण्यात अाला अाहे. मात्र नागपाडा येथील तिरंगा हा सर्वात उंच असेल, असे ई विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी स्पष्ट केले.