राज्यातील जलसाठ्यांची पातळी कमी होत आहे. राज्यातील जलाशयांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्के कमी आहे. त्यामुळे अनेक भागांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे बहुतांश धरणे भरली होती. मात्र, गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. सध्या राज्यातील जलाशयांमध्ये 25.12 टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जलाशयांमध्ये २८.१७ टक्के साठा होता.
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा महसुली विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठ्याची नोंद आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 40.90 टक्के, तर पुणे विभागात सर्वात कमी 18.87 टक्के पाणीसाठा आहे.
नागपूर वगळता राज्यातील सर्वच विभागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. मान्सून लांबणीवर असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. त्यानुसार अद्याप पेरणीला सुरुवात झालेली नाही.
आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या केवळ एक टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, या काळात उन्हाळी म्हणजेच रब्बी हंगामातील मुख्य पिकांची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत १२९ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत एकूण उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 49 हजार 759 हेक्टर एवढी होती, तर यावर्षी 4 लाख 52 हजार 335 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी ते चार लाख 33 हजार 557 हेक्टर होते. तृणधान्य पिकांमध्ये 154 टक्के, अन्नधान्यामध्ये 143 टक्के आणि कडधान्य पिकांच्या पेरणीत 104 टक्के वाढ झाली आहे.
कोकणात जूनच्या मध्यात राज्यातील 515 गावे आणि 1246 वाड्यांना 381 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापैकी कोकणातील सर्वाधिक २७४ गावे, ७७३ वाड्यांना १४६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात 89 गावे, 147 वाड्यांना 96 टँकरने, तर पुणे विभागात 77 गावे, 314 वाड्यांना 63 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
हेही वाचा