गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात चार ते पाच दिवस मान्सून सक्रिय राहील, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ठाण्यातही जोरदार पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे 12 सप्टेंबरपासून मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्रात NDRF, SDRF च्या 7 तुकड्या तैनात
राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) एकूण 5 टीम तैनात आहेत. त्यापैकी कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1, रायगड-1, ठाणे-1, सांगली-1 मुंबईत तैनात आहेत. यासह नांदेड-1, गडचिरोली-1 या दोन ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
1 जूनपासून अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे आणि 368 गावे बाधित झाली आहेत. 117 तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली असून 20 हजार 866 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 307 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून 5789 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 44 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून 3 हजार 540 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
सरकारकडून मोठा दिलासा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी 3 हजार 501 कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
हेही वाचा