बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं राज्यात पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील ५ जिल्ह्यांसाठी मंगळवारी भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. येत्या २ दिवसांत या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.
आयएमडीच्या माहितीनुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला असून जिल्ह्यात पुढील २ दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजापूर शहरातील पूर ओसरला असून कोदवली नदी पुन्हा पूर्वपदावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे.
राजापूर कोदवली नदी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे राजापूर शहराला पुराचा विळखा पडला होता. बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. तब्बल सहा तास बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी होते. मात्र रात्री पावसाने मध्यरात्रीपासून थोडीशी उसंत घेतल्यामुळे राजापूर शहरातील पूर सरला आहे. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यातच आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.