'रिव्हर मार्च' या संस्थाने रविवारी पावसाळ्यानंतर पहिल्यांदा नदी स्वच्छता अभियान राबवलं. कांदिवलीतील क्रांतीनगरजवळील पोयसर नदीच्या १०० मीटर परिसरात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सकाळच्या सुमारास कोणत्याही यंत्राचा वापर न करता 'क्लीन अप ड्राईव्ह'ला सुरुवात करण्यात आली.
या स्वच्छता अभियानात 'रिव्हर मार्च'च्या ग्रुपसोबतच स्थानिकांनीही सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानाद्वारे पोयसर नदीच्या परिसरातून ५०० किलो कचरा गोळा करण्यात आला. महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नदीची सफाई केली होती. पण पावसाळा संपल्यानंतर इथं कचऱ्याचा ढिग साचला.
'रिव्हर मार्च' ही संस्था नद्यांचं संवर्धन आणि स्वच्छतेसाठी काम करते. शहरातील अनेक नद्यांचं रुपांतर नाल्यात झालं आहे. ही संस्था स्वच्छता अभियान राबवत नद्यांची स्थिती सुधारणं किती गरजेचं आहे ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देते.