वांद्रे - रस्ता सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी बीकेसी मैदानात अनोखी जनजागृती मोहीम रविवारी राबवण्यात आली. मोहिमेत मुंबईतल्या विविध शाळेतील 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आयसीआयसीआय लोम्बार्ड खासगी सर्वसाधारण विमा कंपनीच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकांनी आपल्या पाल्याला हेल्मेट घालून बाईक रॅलीत भाग घेतला.
‘लहानपणापासूनच मुलांना हेल्मेट परिधान करण्याची सवय लागावी हा आमचा उद्देश आहे. आम्ही वाटप केलेल्या हेल्मेटचा वापर त्यांचे पालक नेहमी करतील,’ अशी आशा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भार्गवदास गुप्ता यांनी व्यक्त केली. या वेळी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय लोम्बार्ड भार्गवदास गुप्ता, मुंबई वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहाय्यक वाहतूक आयुक्त शाम शेटे, चित्रपट कलाकार रणविजय सिंग, हर्षाली मल्होत्रा उपस्थित होते.