मुंबई - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार नोंदणीचे काम जलदगतीने सुरू आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत ७२ हजार मतदारांत वाढ झाली आहे. ही मतदार नोंदणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी निवडणूक आयोगाने बक्षिस योजना जाहीर केली आहे.
ज्या गृहनिर्माण संस्था, महाविद्यालय आणि मतदान अधिकारी 100 टक्के मतदार नोंदणीचे काम करतील, त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी ही योजना जाहीर केली आहे.
मुंबईत येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यात गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतीतील सर्व मतदारांची नोंदणी शंभर टक्के करावी. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी संबंधित महाविद्यालयांनी करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.