
नवी मुंबई (navi mumbai) अंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात होऊन आता दोन महिने पूर्ण होतील. फक्त 19 दिवसांत, 12 जानेवारीपर्यंत विमानतळावर 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.
तसेच त्यामुळे विमानतळाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे हे दिसत आहे. यामुळे नवी मुंबई विमानतळावर (NMIA) दुसर्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरूवात होणार आहे.
यामुळे विमानतळाचा विस्तार होऊन मुंबई (mumbai), ठाणे, नवी मुंबईतील प्रवाशांना फायदा होणार आहे.
1 फेब्रुवारीपासून नवी मुंबई विमानतलावर 24 तास विमान सेवांना सुरुवात झाली. परंतु, वेळापत्रकात फारसा काही बदल केला गेला नाही. सकाळी 8 आणि रात्री 9 नंतर असे प्रत्येकी दोन उड्डाणांची वाढ करण्यात आली आहे.
पण येत्या जून महिन्यापासून अंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळावर 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.
सध्या या विमानतळावर एक टर्मिनल आणि एक रनवे आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानतळावर दुसरा रनवे उभारण्याची योजना आहे. यामुळे प्रवासी संख्या 6 - 6.5 कोटी इतकी होण्याची शक्यता आहे.
या कामाला 2026चा पावसाळा संपताच सुरुवात होणार आहे. 2029-30 पर्यंत ही काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. काम पूर्ण होताच नवी मुंबई विमानतळावर T1 आणि T2 असे दोन टर्मिनल कार्यन्वित होणार आहेत.
तसेच या दोन टर्मिनलसह, नवीन तयार होणाऱ्या मेट्रोला जोडण्यासाठी ऑटोमेटेड पीपल मुव्हर (APMs) बसवण्यात येणार आहेत.
'अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड' (AAHL) नवी मुंबई विमानतळाचा विस्तार करणार आहे. यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.
सध्या नवी मुंबई विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, अकासा एअर, स्पाईस जेट आणि स्टार एअर या कंपन्यांकडून उड्डाणांना सुरुवात करण्यात आली आहे.
येत्या मे महिन्यापासून नवी मुंबई विमानतळावर 5 मालवाहतूक कंपन्यांकडून मालवाहतूकीच्या सेवांना सुरुवात होणार आहे.
मुंबई विमानतळावर 1 ऑगस्टपासून मर्यादीत काळासाठी मालवाहतूक बंद करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळ आता एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
हेही वाचा
