दूरदर्शनमध्ये काम करणाऱ्या हंगामी मराठी कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वरळी येथील दूरदर्शन कार्यालयावर सोमवारी सकाळी मोर्चा काढला.
दिल्लीवरून आलेल्या कमिटीने वरळी दूरदर्शनमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगितल्यानंतर येथे हंगामी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वरळीतील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर मराठी कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा काढला. हंगामी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असताना जुन्या कामगारांना ५० हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो. पण आम्हाला अगदी तुटपुंजा पगार दिला जातो, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
यावेळी शिवेसना पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून दूरदर्शन प्रशासनाचा निषेध केला. शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, महिला विभागप्रमुख किशोरी पेडणेकर, युवासेने उपविभाग अधिकारी अभिजित पाटील, शिवसेना नेते अजय चौधरी, वरळी विधानसभेतील आदी मंडळी उपस्थित होती. या पदाधिकाऱ्यांनी दूरदर्शनचे महासंचालक थॉमस यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
मागील १७ वर्षांपासून मुंबई दुरदर्शनमध्ये मराठी कर्मचारी कार्यरत आहेत. पण सध्या नव्याने दिल्लीतून आलेले थॉमस या संचालकांनी मराठी कर्मचाऱ्यांना जेरीस आणं आहे. थॉमस यांचा उर्मटपणा शिवसेना अजिबात सहन करणार नाही. त्यांचा कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
- आशिष चेंबूरकर, विभागप्रमुख, शिवसेना, वरळी
थॉमस नावाचा जो नवीन अधिकारी आला आहे, तो मराठी कर्मचाऱ्यांना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देत आहे. हा अधिकारी महिला कर्मचाऱ्यांसशी उर्मटपणे वागतो. आज आम्ही प्रेमळ भाषेत निवेदन देत आहोत. त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करू.
- सुशांत शेलार, कार्याध्यक्ष, शिवसेना चित्रपट सेना