मान्सून आता लवकरच मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल. याचीच खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारखे आजार मुंबईसारख्या शहरात सहज पसरतात. डासांची पैदास वेगाने होत असल्याने मुंबईकर अक्षरश: हैराण होतात. पण, मलेरियामुक्त मुंबई करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने 2030 पर्यंतच टार्गेट ठेवलं आहे. त्यानुसार, महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि अधिकारी कामाला लागले असल्याचं आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.
एफ दक्षिण, जी दक्षिण आणि एम हे तिन्ही महत्त्वाच्या वॉर्ड्समध्ये अनेक बांधकामं सुरू आहेत. शिवाय, लोकसंख्या जास्त असल्याकारणानेही या ठिकाणांवर मुंबई महापालिका विशेष लक्ष ठेऊन असणार आहे. हे तिन्ही वॉर्ड एकाच हद्दीत येतात. त्यामुळे इन्फेक्शन जास्त पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईकरांनीही जास्त काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन डॉ. रेवणकर यांनी केलं आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2017 मध्ये मुंबईत मलेरियाच्या एकूण 6 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 2017 च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईत मलेरियाचे दोन हजार रुग्ण आढळले होते. ही संख्या कमी व्हावी म्हणून मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व तयारी सुरू करत डॉक्टर्स, स्टाफ, नर्स, कर्मचाऱ्यांपासून सर्व वॉर्ड ऑफिसर यांना आपआपल्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याचं आवाहन केलं आहे.
2030 पर्यंत मुंबईला मलेरियामुक्त करण्याचं टार्गेट आमच्यासमोर आहे. त्यादिशेने आमची वाटचाल सुरू आहे. मुंबईला मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण, या प्रयत्नात मुंबईकरांनीही साथ दिली पाहिजे. तर हा प्रयत्न यशस्वी होऊ शकणार आहे. मलेरिया आजाराची माशी ही शुद्ध पाण्यात अंडी सोडते. ते पाणी जर तीन-चार दिवस तसंच ठेवलं तर त्यातून मलेरियाच्या डासांचा प्रादूर्भाव होतो. त्यामुळे घराजवळ, परिसराजवळ कुठेही पाणी साचू नये आणि स्वच्छता राखावी.
- डॉ. संतोष रेवणकर ,संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका